तळे
विस्तीर्ण पसरलेले शांत, निळे तळे मला
ध्यानस्थ योग्या प्रमाणे वाटते. वाऱ्याच्या अनवट लहरींनी तळ्याच्या निळसर पाठीवर
वर्तुळाकार शहरे यावेत अन् तळ्याच्या त्या मोहमयी रुपावर काठावरच्या झाडांनी फिदा
व्हावे. त्यांनी हलकेच आपली पाने तळ्याच्या कातीव देहावर उधळावीत आणि हे आपण
तळ्याच्या काठावर उभे राहून पहावे,या सारखा आनंद मला वाटते दुसरा नसावा...
का कुणास ठाऊक तळे माझ्या जीवनाचा
अविभाज्य घटक आहे.तळ्यांची विलक्षण बेभान रूपे मला बघता आली, त्यांचे राजस लावण्य
मनसोक्त पाहता आले. त्यांचे निशब्द चैतन्य जगता आले.त्यांचे अथांग पण भोगता आले,
माझे एकाकीपण त्यांना सांगता आले. तळ्यांच्या थंड शिरशिरत्या पाण्यात डोळे बंद
करून डुंबता आले....
मला आठवतेय...मी आण्णांच्या म्हणजे
माझ्या वडिलांच्या सायकल वर बसून तालुक्याच्या गावी जाई. त्या वेळेस एस्. टी.बसेस फारशा
नव्हत्याच.त्यामुळे प्रवास हा सायकलचाच असायचा. आण्णा भल्या सकाळी तालुक्याला
निघत...मी पाठीमागे निवांत बसलेलो असायचो.सकाळचा प्रसन्न गारवा हवेत दाटलेला
असायचा. सूर्यफुलांची पिवळी शेते ओलांडीत आमचा प्रवास चालू असायचा.चित्रा सारखी
स्थिर सूर्यफुलांची शेते ...खूप दूरवर निळ्यासावळ्या डोंगरांच्या रांगा...त्यावर
उगीचच गर्दी करून असलेले पांढऱ्या ढगांचे दुधी पुंजके...मधूनच विहिरीवरच्या मोटेची
ऐकू येणारी कुई कुई ... त्या बरोबर गाण्यातून मोटक-याने बैलांना घातलेली प्रेमळ
साद, या साऱ्या गोष्टी अगदी चित्रमय असायच्या.कुठेही कसला गोंधळ नाही,गोंगाट
नाही...सारे कसे निवांत - स्तब्ध असायचे.त्यातच असायचो आम्ही...आमची सायकल या
साऱ्यातून संथ चालायची.सायकलच्या त्या संथपणामुळे अधून-मधून मला डुलकी यायची.मग
आण्णा म्हणायचे, ‘झोपलास काय रे तातू??’ ‘ नाही आण्णा ...’ मी खडबडून जागे होत
म्हणायचो.आण्णा नंतर सायकलचा स्पीड वाढवत....
त्यानंतर लांबूनच मला दुरगावाच्या
तळ्याची निळी विस्तीर्ण रेघ दिसे..मी खुश
होई.मग मी म्हणे, ‘आण्णा तळ्याच्या भरावा वरून जाऊयात ना?’आण्णा हसून म्हणत, ‘ जाऊ
ना....’ आता सायकलचा वेग वाढलेला असे.तळ्याची निळी रेघ खूप जवळ येई.बाजूची हिरवी
गर्द झाडे नजरेत भरत. पाण्याच्या नीलकांती देहावरून घुटमळत येणारा वारा मला
प्रसन्न बनवी.ढगांची मोहक प्रतिबिंबे डचमळताना दिसत. काठावर कुणी एखादा पाण्यात गळ
टाकून निवांतपणे मासेमारी करताना दिसे.पाखरांचे अचल थवे बाजूच्या हिरव्याकंच पाणगवतावर
ध्यानस्थ दिसत.
आम्ही आता तळ्याच्या भरावा जवळ
यायचो.आण्णा भरावा कडेची सडक टाळून भरावा वरच्या पायवाटेवरून अगदी संथपणे सायकल चालवीत.पाण्यावरून घसरत जाणाऱ्या बदक
पिलांसारखी अण्णांची सायकल त्या वाटेवरून पुढे जात राही.तळ्यात नंतर दृष्टीस पडत
काही पाणकोंबडया, बदकांची घोळक्याने तरंगणारी सुरेख पिले, उंच पायांचे शुभ्र
बगळे... त्यांची लांबट प्रतिबिंबे पाण्यावर हलताना दिसत.बाजूच्या काठावर दोरीने
बांधलेली एकाकी होडी पाण्यावर मनस्वी डुलताना दिसे....
आता दिवस उगवून खूप वर आलेला असे.सकाळची
वस्त्रे अजून दिवसाच्या अंगावरून निघालेली नसत. सूर्यकिरणांमुळे पाणी सोनेरी
चमकताना दिसे.आण्णा घडीभर सायकल उभी करीत आणि आपसूकच त्यांच्या सुरेल गळ्यातून ‘
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख SSS होते कुरूप वेडे
पिल्लू तयात एक....’ या गीताची लकेर बाहेर पडे.त्या गाण्याचे सूर, ते धीरगंभीर
तळे, त्याच्या काठावरची स्वमग्न झाडे, त्यांची पाण्यातील काळसर हिरवट प्रतिबिंबे,
सर्व जगाला विसरून पाण्यात स्वच्छंद तरंगणारी बदक पिले....या साऱ्या जादूभरल्या
वातावरणात मी तो विलक्षण देखावा नजरेत साठवण्याचा प्रयत्न करायचो.आजूबाजूला कुणीही
नसायचे डाव्या बाजूस खूप खोलवर भरावाच्या पायथ्या जवळून रेघ मारल्या सारखी डांबरी
सडक दिसायची.या अशा नि:शब्द वातावरणात तळेच माझ्याशी शब्द बनून बोलत राहायचे....
कॉलेज मध्ये असताना मी लोखंडद-याच्या
तळ्यात पोहायचो. ..त्या तळ्याच्या बाजूला हिरवे गर्द जंगल होते... आजही आहे.त्या
जंगलाच्या हिरव्या कोंदणातील निळा हिरा म्हणजे हे तळे.... तळ्याच्या एका टोकाकडून
दुसऱ्या टोकाकडे पोहत जायचे हे खूप कठीण काम असायचे.मित्रांसोबत अगदी सकाळी मी
त्या तळ्यावर जायचो सकाळच्या तांबूस पिवळ्या उन्हात तळ्याच्या पाण्यात शिरलो की
अंगावर थंडीचा काटा येई. पण पुढे दहा बारा फूट पोहत गेलो की ही थंडी पळून जाई. पाणी
अंगाला उबदार वाटे.पलीकडच्या तीरावर काही म्हशी पाण्यात डुंबताना दिसत.तळ्याची एक
निळी बाजू शेपटा सारखी जंगलात घुसलेली असे.तळ्याच्या मध्यभागी गेल्यावर विश्रांती
साठी पाठीवर उताणे पडायचो. पाणी शांत असायचे. वर स्वच्छ निळे आभाळ दिसायचे.त्या
निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर रांगेत उडत जाणारे बगळे आम्ही खूपदा बघायचो...
दमून पलीकडच्या तीरावर गेल्यावर जंगलाची
हिरवी गर्द तनु नजरेत भरे. गुडघ्याइतक्या तिथल्या गवतातून बऱ्याचदा राखाडी
रंगाचे ससे घाबरून दूर पळताना दिसत.तर कधी आमची ही तमा न बाळगता बिनधास्त चरणारा
हरणांचा कळप दिसे.ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात सुद्धा तळ्यात खूप पाणी
असे.त्यावेळेस जंगलातील बोरीची झाडे लाल पिवळ्या बोरांनी लगडून गेलेली असत.काही बोरांच्या
झाडाखाली तर बोरांचा खच असे..
लोखंडदऱ्याच्या तळ्यातील पोहण्याचे ते
दिवस असे अमृतमयी होते.आता पाऊस असा माणसासारखा बेभरवशाचा झालाय. त्यामुळे या
तळ्यात आता फारसे पाणी जमत नाही.आणि त्या जमलेल्या पाण्यात वाहने धुण्यासाठी
वाहनाची रांग असते.त्या मुळे तिथे बगळे नाहीत, पाणकोंबडया नाहीत, निवांत चरणारे हरणांचे
कळप नाहीत, ती मनाला भावणारी नि:शब्द शांतता नाही.तळ्याचे ते अनाघ्रात सौंदर्य
केव्हाच काळवंडलेय.....
गेल्या वर्षी मी भंडारदरा धरणातून
रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी नावेतून प्रवास केला. तो अनुभव काही
वेगळाच होता.ती सकाळची नऊची वेळ होती.धरणात मस्त अंघोळ करून आम्ही नावेत
बसलो.बाजूला धुक्यात हरवलेले कळसूबाई शिखर होते.समोर रतनगडाचा अंगठयासारखा
उंचावलेला सुळका दिसत होता.नव्या कोऱ्या नावेतून आमचा तो स्वप्नवत प्रवास सुरु
होता.आता अमृतेश्वराला जाण्यासाठी सडक सुद्धा आहे.पण या तळ्यातून तो एक तासाचा
केलेला प्रवास आजही माझ्या स्वप्नात येतो.अतिशय नितळ स्वच्छ पाणी, स्वच्छ
सूर्यप्रकाश, बाजूच्या पूर्ण हिरव्या डोंगरांच्या सुंदर रांगा, त्यावर झाडांची
दाटी आणि त्यातूनच अधून मधून डोकावणारी उतरत्या छपरांची कौलारू घरे.... त्या
घरांच्या बाजूला नारळांची दाटी...अंगणात पोपटी रंगाचे भाताचे शेत... काय हवे असते
आणखी जगायला? काय हवे असते आणखी विसरायला ? काय हवे असते अजून बेभान व्हायला..ही
तळी अशी आपल्याला जगण्याचे रंग देतात.ही तळीं अशी आपल्या जीवनाची पोकळी विविध रंगानी रंगवतात.ही तळी अशी आपल्या मनाच्या गूढत्वा पर्यंत पोहचतात.आणि आपल्यालाच निसर्ग बनवून
टाकतात.
‘वाल्ट व्हिटमन’ हा अमेरिकन कवी त्याच्या ‘सॉग ऑफ मायसेल्फ’
या कवितेत म्हणतो ,
‘I celebrate myself and sing myself
For every atom belonging to me as
good belongs to you…
I loafe and invite my soul…’ निसर्गाच्या देखण्या रूपाचा आस्वाद घेताना मी स्वत:साठीच जीवनगाणे गातो.मी
स्वतःच माझ्या जगण्याचा उत्सव साजरा करतो आणि हे करीत असताना मी स्वतःच तो निसर्ग,
ते तळे होऊन जातो..मी आनंदाचा डोह बनून जातो...
भीष्माचार्य
लक्ष्मण चांदणे mob - 988 1174 988
मु.पो.देवळाली
ता.करमाळा जि. सोलापूर